अमित शहांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान, हा माझ्या कार्याचा गौरव- अप्पासाहेब

अमित शहांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान, हा माझ्या कार्याचा गौरव- अप्पासाहेब
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला . नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा जंगी सोहळा पार पडत आहे. एखाद्या शासकीय सोहळ्याचा इतका मोठा इव्हेंट करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अनुयायी या मेळाव्यास उपस्थित आहेत .
मुख्य मुद्दे
- सोहळ्यात प्रथम डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोहळ्याला हजेरी लावली असून सर्वसजण कॉर्पोरेट मैदानावर उपस्थित आहेत.
- ‘जय जय महाराष्ट्र माझा’, या महाराष्ट्र गीताने सोहळ्याला सुरुवात झाली.
- यात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व 25 लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
- पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, हा माझा नव्हे तर माझ्या कार्याचा, माझ्या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचा गौरव आहे. 1943 पासून प्रथम खेड्यांमधून मी समाजकार्याला सुरूवात केली. खेड्यातील बहुसंख्य लोक हे अंधश्रद्धा, जुन्या चालीरितीने ग्रासलेले आहेत. त्यांना चांगले वळण लागायला हवे. त्यांची वागणूक सुधारावी, ही माझी भावना होती.
- अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, जगात माणुसकी धर्म हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे श्वासात श्वास असेपर्यंत मी हे कार्य चालू ठेवणार आहे. माझा हा पुरस्कार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी समर्पीत आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाजकार्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.
- उपस्थितांना संबोधित करताना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आवाहन केले की, या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान 5 रोपे तरी लावलीच पाहीजे. तसेच, नंतर वृक्षांची निगाही राखली पाहीजे. प्रत्येकाने हा संकल्प या पावसाळ्यात केला पाहीजे. तसेच, आपल्या प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर तसेच इतर शिबिरांविषयीही माहिती दिली.
सोहळ्यासाठी खारघर येथील मैदानावर अप्पासाहेबांच्या 5 लाखांहून अधिक श्रीसदस्यांनी हजेरी लावली आहे. ते शुक्रवारपासूनच शिस्तीने नवी मुंबईकडे निघाले होते. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकारी व भाजप – शिवसेनेची यंत्रणा हा सोहळा ‘ना भूतो न भविष्यति’ करण्यासाठी झटले. सुमारे 600 हून अधिक स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मोठी वोट बँक आकर्षित करण्यासाठी युतीचे प्रयत्न!

डॉ. अप्पासाहेब व त्यांचे पिता नानासाहेबांचे देशभरात लाखो अनुयायी आहेत. कोकण, मुंबईत ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी बहुतांश लोक ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे होते. या सोहळ्याच्या माध्यमातून ही ‘वोट बँक’ आकर्षित करण्याचे शिंदे व भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चा जनमानसात सुरु आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातून हजारो श्रीसदस्य सोहळ्यासाठी आले आहेत. अमित शहांसारख्या बड्या नेत्याकडून अप्पासाहेबांचा गौरव करुन या अनुयायांचीही मने जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न यातून स्पष्ट होतांना दिसत आहे .

तयारी 20 लाख लोकांच्या सोयीची, 350 डॉक्टर्सही देणार सेवा
सोहळ्यासाठी अप्पासाहेबांचे 5 लाखांहून अधिक अनुयायी येण्याचा अंदाज आहे. मात्र ही संख्या किती वाढेल याचा अंदाज नसल्याने सरकारने 20 लाख लोकांची सोय होईल एवढी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंगचा समावेश आहे. रेल्वेस्थानकापासून सोहळ्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोफत बसची सोय केली आहे. कार्यक्रमस्थळी 250 टँकर, 2100 नळ बसवण्यात आले आहेत. 69 रुग्णवाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. 32 फिरती शौचालये, 4200 पोर्टेबल शौचालये, 9 हजार तात्पुरते शौचालये बांधण्यात आली आहेत. 22 ठिकाणी पार्किंगची सोय आहे.




