तांदुळवाडी येथे कै. विमलबाई पाटील यांना अनोखी श्रद्धांजली, अस्थी विसर्जनानंतर आंब्याच्या झाडांचे रोपण

भडगाव (प्रतिनिधी – संजय शेवाळे): तालुक्यातील तांदुळवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष जयवंतराव नारायण पाटील यांच्या मातोश्री कै. गं.भा. विमलबाई नारायण पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन एका अत्यंत अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले. पाटील कुटुंबीयांनी “मरावे परी वृक्ष रुपी जगावे” या संकल्पनेतून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी अस्थींचे वृक्षात विसर्जन करून एक आदर्श पायंडा पाडला आहे.
कै. विमलबाई पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जित न करता, शेतामध्ये दोन आंब्याच्या रोपांची लागवड करून त्या झाडांच्या मुळाशी अत्यंत श्रद्धेने आणि आदराने विसर्जित करण्यात आल्या. हा वैशिष्ट्यपूर्ण विधी भाऊसाहेब श्री. निंबालाल नामदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कै. विमलबाई पाटील यांचे सुपुत्र तथा तंटामुक्ती अध्यक्ष जयवंतराव नारायण पाटील (बाबासाहेब) आणि सारंगराव नारायण पाटील (बापूसाहेब) यांच्यासह नातवंडांच्या हस्ते वृक्षारोपण व अस्थी विसर्जन करण्यात आले.
यावेळी बोलताना जयवंतराव पाटील म्हणाले, “आईच्या आठवणी आणि तिचे आशीर्वाद या वृक्षांच्या रुपाने आमच्यासोबत कायम राहतील. ही झाडे जशी वाढतील, बहरतील, तशी तिची स्मृती अधिकच हिरवीगार राहील.” पाटील कुटुंबाच्या या कृतीमुळे निसर्गाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि विचारांची व्यापकता दिसून येते. त्यांच्या या पर्यावरणपूरक आणि भावनिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या झाडांच्या माध्यमातून कै. विमलबाई पाटील यांच्या आठवणींना एक शाश्वत रूप मिळाले आहे, हे निश्चित.



