मंगरूळ परिसरात वादळ, गारा आणि पावसाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मंगरूळ परिसरात वादळ, गारा आणि पावसाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मंगरूळ (प्रतिनिधी- भाऊसाहेब पाटील ): मंगरूळ परिसरात रविवार, दि. १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसाने मोठा कहर केला. जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
परिसरात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामादरम्यान बसविण्यात आलेल्या अनेक सोलर प्लेट्स व लोखंडी पाईप्स वादळाच्या तडाख्याने तुटून पडल्या. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सौर सिंचन प्रणालीचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी संपूर्ण यंत्रणा चकणाचूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या गुरांसाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपरे आणि तात्पुरत्या बांधकामांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याने गुरे व जनावरेही धोक्यात आली. रस्त्यांलगतची अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला.
या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी अपेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी
वादळ, गारपीट आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परिसरातील नागरिक सध्या प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.



