शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण: संदीप महाजन न्यायालयात त्रयस्थ पक्षकार म्हणून दाखल; तपासाला नवे वळण तर काहींचे नांव वगळण्यासाठी आर्थिक देवाणघेवण्याची शक्यता!

शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण: संदीप महाजन न्यायालयात त्रयस्थ पक्षकार म्हणून दाखल; तपासाला नवे वळण तर काहींचे नांव वगळण्यासाठी आर्थिक देवाणघेवण्याची शक्यता!
**पाचोरा |( डॉ योगेश पाटील)
पाचोरा तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळ्याला दिवसेंदिवस नवे वळण मिळत असून, या प्रकरणातील तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कोट्यवधींच्या सरकारी अनुदानाची अफरातफर, बनावट सह्या, कागदपत्रांमध्ये फेरफार, तसेच राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेपाच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, शेतकरी आंदोलक संदीप दामोदर महाजन यांनी या प्रकरणात न्यायालयात त्रयस्थ अर्जदार (थर्ड पार्टी) म्हणून सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. महाजन यांच्यावतीने डॉ. अंकुश कटारे यांनी हा अर्ज **ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास (गचक्रउ)** न्यायालयात सादर केला असून, तो **विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW)** अभिप्रायासाठी वर्ग करण्यात आला आहे.
### **अनुदानाच्या अफरातफरीचा फुगा मोठा?**
या प्रकरणाचा तपास सध्या **विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW)** असून, सुरुवातीला अटकेत असलेल्या आरोपी अमोल भोई व गणेश चव्हाण यांना न्यायालयाने **४ ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलिस कोठडीत ठेवले आहे**. सुनावणीत पोलिसांनी आणखी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पोलिसांचा युक्तिवाद होता की, **बँक व्यवहार, खातेवही, जमीनहक्क कागदपत्रे, डिजिटल पुरावे व शेतकऱ्यांचे जबाब** यांचा तपास बाकी आहे.
### **महसूल विभागातील हालचाली संशयास्पद**
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर **सारोळा बु** येथील महसूल अधिकारी आशिष कडुबा काकडे यांना ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निलंबित केले. मात्र, निलंबन आदेशात **अनुदान घोटाळ्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे**, प्रशासकीय दबावाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर, **तहसीलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीवरही प्रश्नचिन्ह** उपस्थित झाले आहे. या समितीने काही निवडक व्यक्तींवरच दोषारोप ठेवून इतरांना वगळल्याचा आरोप संदीप महाजन यांनी केला आहे. या मुळे दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा देखील होत आहे. परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजड किंवा प्रकरण दाबण्यात येणार नसून कोणत्याही दोषींना वाचवण्यासाठी प्रशासन पुढे आल्यास त्यांनाही यात आरोपी केले जाईल असे यावेळी संदीप महाजन यांनी सांगितले .
**संदीप महाजन यांची त्रयस्थ अर्जाची भूमिका**
महाजन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात स्पष्ट नमूद केले आहे की, **मूळ फिर्यादीकडे सर्व माहिती नसल्यामुळे तपास अर्धवट दिशेने जात आहे**. त्यामुळे, प्रत्यक्ष पीडित शेतकऱ्यांना तपासात सामील करून **सत्य बाहेर आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे**. त्यांनी २८ मे आणि २८ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल व पोलिस विभागात लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
**राजकीय मौन आणि जनतेची अपेक्षा**
या प्रकरणामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अनेक **लोकप्रतिनिधी या विषयावर मौन बाळगून आहेत**, तर नागरिकांतून **दोषींवर कठोर कारवाई व्हावी**, अशी जोरदार मागणी होत आहे.
७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी आणि त्यानंतर येणाऱ्या तपास अहवालातून **नवे पुरावे व धागेदोरे उलगडण्याची शक्यता** असून, विशेष आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय हस्तक्षेपापासून स्वतंत्र राहून निष्पक्ष चौकशी केली, तरच **शेतकऱ्यांचा न्याय आणि महसूल व्यवस्थेवरील जनविश्वास परत येईल**, असे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.



