
पाचोरा (योगेश पाटील)- सर्वत्र मिडीयात सत्ता संघर्षाच्या बातम्या झळकत असून मात्र शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी कुठे तरी लपविल जात असल्याचे चित्र दिसत आहे. कुणीही शेतकर्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीत नाही . मात्र राजकारणी , शासन ,प्रशासन , मिडीया यांच्या झणझणीत अंजन घालणारा सामाजिक प्रश्न ज्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. असाच एका प्रश्नाकडे एक शेतकरी पुत्राने लक्ष वेधण्याचे काम पाचोरा येथे केले आहे.
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या युवकाने एक अनोखे आंदोलन केले आहे. भर चौकात ‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे’ असे मोठमोठ्याने ओरडत घोषणा देत एक उच्चशिक्षित तरुण पाचोऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. हातात फलक घेऊन कपाळी बाशिंग बांधून नवरदेवाच्या वेशात या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत सध्या भेडसावत असलेल्या एका सामाजिक प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका नाचणखेडे येथील पंकज राजेंद्र महाले हा ३२ वर्षीय उच्चशिक्षित तरुण आहे. त्याच्याकडे दहा एकर बागायती शेतीचा मालक, बीएस्सी अग्री अशी उच्च शिक्षणाची पदवी आहे. मात्र उत्तम प्रकारे शेती करणारा पंकज ३२ वर्षाचा झाला तरी अजून उपवर आहे. म्हणजे अजून त्याचे लग्न जमत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लग्नासाठी वधूच्या शोधार्थ फिरून केवळ नोकरी नसल्याने नकार मिळत असल्याने तो हताश झाला आहे झाला व त्याने शेतकऱ्यांस कशी वागणूक मिळते याचे ज्वलंत उदाहरण समाजासमोर मांडले .
मी शेतकरी पुत्र आहे हा गुन्हा आहे का!
ग्रामीण भागातील मुलांना खास करून शेतकऱ्याच्या पोरांना वधू मिळाल्या पाहिजेत. नवऱ्या मुलांकडे शेती हवी असा प्रत्येक वधू पित्याचा आग्रह असला तरी शेती करत असणाऱ्या शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचे हे खरं वास्तव आहे. हे समाजपुढे आणण्यासाठी हे अनोखे आंदोलन मी सुरू केले आहे. सर्व शेतकरी पुत्रांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. एखाद्या नोकरदारापेक्षा चांगले उत्पन्न मिळवूनही केवळ शेतकरी आहे किंवा नोकरी नाही, यासाठी शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देऊ नये, अशी वधू पित्याची भावना चुकीची आहे. अस मत न्यूज झेप इंडिया शी बोलताना पंकजने मांडले.
या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा
शेतकरी पुत्राला वधू पाहिजे म्हणून पाचोरा शहरात पंकज या शेतकरी पुत्राने अनोखे आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे एक वेगळी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. या सामाजिक प्रश्नावर विचार करण्याची गरज सर्वांना आहे.



