गिरडच्या युवकाच्या संशयास्पद मृत्यूने गाव हादरले; सत्य आणि न्यायासाठी नागरिकांची एकजूट !

गिरडच्या युवकाच्या संशयास्पद मृत्यूने गाव हादरले; सत्य आणि न्यायासाठी नागरिकांची एकजूट
पाचोरा प्रतिनिधी : (योगेश पाटील ) – भडगाव तालुक्यातील गिरड येथील होतकरू युवक तथा मालक फॅशन, पाचोरा येथील व्यावसायिक रविंद्र संजय मोरे (कोळी) यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कर्तबगार आणि उमद्या तरुणाच्या अकाली निधनामुळे गिरड गावासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
एखाद्या कुटुंबातील तरुण सदस्याचा मृत्यू हा त्या कुटुंबासाठी मोठा आघात असतोच; मात्र समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या युवकाच्या निधनाने संपूर्ण गावाच्या भावना तीव्र होणे स्वाभाविक आहे. रविंद्र मोरे यांच्या निधनानंतर गिरड गावातील नागरिकांनी दुःख व्यक्त करत घटनेतील सत्य बाहेर यावे आणि संबंधितांना न्याय मिळावा, अशी ठाम भूमिका घेतली.
गिरड गाव हे सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि गावहितासाठी एकदिलाने उभे राहणाऱ्या नागरिकांसाठी ओळखले जाते. गावातील युवकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सर्व स्तरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी पाचोरा पोलीस ठाणे परिसरात एकत्र आले.
या वेळी उपस्थित नागरिकांनी घटनेचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली. रविंद्र मोरे यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय आहेत, याचा उलगडा होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
दरम्यान, नागरिकांच्या भावना तीव्र असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अशा संवेदनशील परिस्थितीत पाचोरा पोलिसांनी संयम, संवाद आणि समन्वय यांचा आधार घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच तपास निष्पक्षपणे केला जाईल, असे आश्वासन दिल्याने उपस्थितांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनीही परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये गेला.
सध्या संपूर्ण गिरड गावाचे लक्ष तपासाच्या पुढील घडामोडींवर असून, रविंद्र मोरे यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

